





Product Details
विविध देव-देवता, श्रीगुरू तसेच इतर थोर अवतारी विभूतींवर रचल्या गेलेल्या स्तोत्रांनी भारताचा आध्यात्मिक वारसा समृद्ध केला आहे. देव-देवतांची वर्णने, त्यांचे दिव्य गुणानुवर्णन, भक्ताच्या अंतरीची व्याकुळता व शरणागती अशा बहुविध विषयांची स्तोत्रे साधकाला आध्यात्मिकतेच्या उच्च उच्चतर शिखरावर आरूढ करीत असतात. साधकाचे अंतरंग भगवद्भावाने रंगून जाण्यास स्तोत्रपाठ व त्यांचे चिंतन-मनन उपयुक्त ठरते हे नव्याने सांगावयास नकोच. आध्यात्मिक प्रज्ञा आणि वाङ्मयीन प्रतिभा या दोहोंचा एकत्रित प्रत्यय देणारे हे दक्षिणामूर्ति स्तोत्र श्रीशंकराचार्यांच्या सर्वोत्तम स्तोत्रांपैकी एक आहे. सर्वात्मभावासारखी सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती, ‘तत्त्वमसि’ हे उपदेशपर महावाक्य, गुरुमाहात्म्य आणि त्याला आधारभूत उपासना अशी अध्यात्मपर सर्वच विषयांची एकत्रित सुरेख, युक्तिसंगत व सुसंबद्ध गुंफण या स्तोत्रात बघावयास मिळते. या स्तोत्रातील पहिल्या श्लोकापासून आठव्या श्लोकापर्यंत भगवत्पूज्यपाद आचार्यांनी प्रत्येकच श्लोकात माया अथवा त्याचा पर्यायी शब्द घालून मायेमुळे सत्स्वरूप आत्मचैतन्यावर दृश्यमान विश्वाचा अध्यारोप हा भ्रम उत्पन्न होतो, हे युक्तिसंगत स्पष्ट केले आहे. ‘आत्मचैतन्याखेरीज कोणतेही दुसरे सत्य नाही हे श्रुतिसिद्ध ज्ञान ज्यांच्या कृपेने होते त्या श्रीदक्षिणामूर्ती रूप श्रीगुरूंना माझे नमन असो’, असे सर्वच श्लोकांच्या शेवटी ध्रुवपद आलेले आहे.