Product Details
स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्राच्या पुनरुत्थानाच्या संदर्भात वेळोवेळी जे विचार प्रकट केले आहेत ते खरोखरच अत्यंत स्फूर्तिदायी आणि व्यवहार्य आहेत. त्यांच्यात सर्वांगसंपूर्ण पूर्णविकसित नवीन राष्ट्र घडवून आणण्याचे अपार सामर्थ्य आहे. स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार चालल्याने देशवासियांच्या वैयक्तिक उन्नतीबरोबरच राष्ट्राची सर्वांगीण उन्नती होईल हे खात्रीने सांगता येते. आपल्या राष्ट्राच्या आजच्या या चिंताजनक परिस्थितीत स्वामीजींच्या या ओजस्वी व शक्तिदायी विचारांची अत्यंत गरज आहे. म्हणून त्यांच्या या संदर्भातील निवडक विचारांचे हे संकलन प्रसिद्ध करण्यात आले. यातील अधिकांश उद्धरणे आम्ही दहा भागांत प्रकाशित केलेल्या ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावली’मधून घेतली असून प्रत्येक उद्धरणाच्या खाली त्याचा संदर्भ देण्यात आला आहे. पहिला आकडा ग्रंथावलीचा भाग व दुसरा पृष्ठसंख्या दर्शवितो. ‘खरा माणूस’ निर्माण होण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीला गौरवपूर्ण उच्चपदावर प्रतिष्ठित करण्यासाठी दैवी व्यक्तिमत्त्वाचे अधिष्ठान असलेले स्वामी विवेकानंदांचे हे शक्तिदायी विचार सर्वांना मार्गदर्शक ठरतील.